गडकोट विकास महामंडळासाठी जागर प्रतिष्ठानचा लढा तीव्र; तुळजापूरात किसन पाटील चव्हाण यांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी
गडकोट विकास महामंडळासाठी जागर प्रतिष्ठानचा लढा तीव्र; तुळजापूरात किसन पाटील चव्हाण यांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी
राज्यातील १२० तालुक्यांतील तहसील कार्यालयांना निवेदन; शासनाने तातडीने निर्णय घ्यावा – इतिहासप्रेमींची मागणी
राहुल कोरे आळणीकर
तुळजापूर : स्वराज्यकालीन गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन व विकासासाठी स्वतंत्र “गडकोट विकास महामंडळ” स्थापन करण्याच्या मागणीसाठी जागर प्रतिष्ठानच्या वतीने राज्यभर आंदोलन उभारण्यात आले आहे. या मागणीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील तब्बल १२० तालुक्यांतील तहसील कार्यालयांना निवेदन देण्यात आले असून शासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा इतिहास सांगणारे गडकिल्ले, मावळ्यांच्या समाध्या आणि विविध ऐतिहासिक स्थळांचे जतन व विकास व्हावा, यासाठी स्वतंत्र गडकोट विकास महामंडळाची स्थापना आवश्यक असल्याची भूमिका जागर प्रतिष्ठानने मांडली आहे.
दरम्यान, या मागणीसाठी जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष किसन पाटील चव्हाण यांनी तुळजापूर येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून दि. ११ मार्च २०२६ रोजी उपोषणाचा सातवा दिवस पूर्ण झाला आहे. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
मात्र सात दिवस उलटूनही शासनाकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नसल्याने आंदोलन आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्यातील विविध सामाजिक संघटना, इतिहासप्रेमी व शिवभक्तांकडून या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे.दरम्यान, जिल्ह्याचे शिवसेना खासदार, शिवसेना आमदार तसेच तुळजापूर तालुक्याचे भाजपाचे आमदार यांनी या आंदोलनाची दखल घेऊन शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.