धाराशिव भाजपचा नवा पायंडाहार-तुरे टाळून शालेय साहित्य द्या!विजयाचा जल्लोष आता सामाजिक बांधिलकीतून: आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

धाराशिव भाजपचा नवा पायंडा

हार-तुरे टाळून शालेय साहित्य द्या
विजयाचा जल्लोष आता सामाजिक बांधिलकीतून: आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन
राहुल कोरे आळणीकर 
​धाराशिव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने धाराशिव जिल्ह्यात मिळवलेले यश हे केवळ राजकीय नसून, तो जनतेने सकारात्मक कामाला दिलेला कौल आहे. या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करताना 'उत्सवा'ला 'सेवे'ची जोड देत, यापुढे कोणाचाही सत्कार हार, तुरे किंवा शाल देऊन न करता, शालेय साहित्य देऊन करावा, असे अभिनव आवाहन जिल्ह्याचे नेते तथा भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

​नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही भाजपाने जिल्ह्यात दैदिप्यमान यश संपादन केले आहे. नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. अर्चना पाटील यांच्यासह सर्व विजयी सदस्यांचे आणि सभापतींचे जिल्ह्यात जंगी स्वागत होत आहे. हा उत्साह साजरा करताना सामाजिक बांधिलकीही जपली जावी, या उदात्त हेतूने आमदार पाटील यांनी अभिनव आवाहन केले आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना ​सत्काराचे स्वरूप बदलून त्यात शालेय साहित्याला प्राधान्य द्यावे असे म्हटले आहे. यापुढे पक्षाच्या कोणत्याही विजयी पदाधिकारी किंवा नेत्याचा सत्कार करताना हार, तुरे, फेटे, बुके किंवा महागड्या शालींचा वापर करू नये. सत्कारासाठी खर्च होणाऱ्या रकमेतून वही, पेन, दप्तर किंवा इतर शालेय साहित्य भेट म्हणून द्यावे. जमा झालेले हे सर्व शालेय साहित्य जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील गरजू आणि होतकरू विद्यार्थी-विद्यार्थिनींना वितरित केले जाईल.

 सत्तेचा वापर हा केवळ पदासाठी नसून तो समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी असावा, ही भाजपची संस्कृती असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

​"भाजपा हा केवळ राजकीय पक्ष नसून सामाजिक बांधिलकी जोपासणारे एक कुटुंब आहे. आपल्या विजयाचा खरा आनंद तेव्हाच मिळेल, जेव्हा त्यातून एखाद्या गरजू विद्यार्थ्याच्या शिक्षणाला हातभार लागेल. कार्यकर्त्यांनी अभिनव पद्धतीने स्वागत स्वीकारून सकारात्मक राजकारणाचा नवा आदर्श जिल्ह्यात निर्माण करावा असेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नमूद केले आहे. आमदार पाटील यांच्या या आवाहनामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एक वेगळी आणि सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. अनावश्यक खर्चाला फाटा देऊन थेट विद्यार्थ्यांच्या मदतीचा हा निर्णय जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी फायदेशीर ठरणार आहे. 'सत्कार शिक्षणासाठी' या भूमिकेमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून, आता जिल्हाभरात होणारे सत्कार सोहळे हे खऱ्या अर्थाने 'ज्ञानयज्ञ' ठरणार आहेत.

महायुतीतील सहकारीही सहभागी होतील याचा विश्वास 

महायुतीमधील काही सहकारी बांधवांशी याबाबत चर्चा केली आहे. भाजपाने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने सुरू केलेल्या महत्त्वपूर्ण उपक्रमात महायुतीतील घटक पक्षातील सहकारी बांधवही उत्स्फूर्तपणे सहभागी होतील असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक