धाराशिव शहर आता महिलांसाठी होणार अधिक सुरक्षित नगराध्यक्षा नेहा काकडे यांची पोलीस अधीक्षकांशी चर्चाशाळा, महाविद्यालये आणि बसस्थानक परिसरात 'निर्भय' व 'पिंक' पथकाची गस्त वाढणार

धाराशिव शहर आता महिलांसाठी होणार अधिक सुरक्षित नगराध्यक्षा नेहा काकडे यांची पोलीस अधीक्षकांशी चर्चा
शाळा, महाविद्यालये आणि बसस्थानक परिसरात 'निर्भय' व 'पिंक' पथकाची गस्त वाढणार
राहुल कोरे आळणीकर 
धाराशिव: 
शहरातील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, प्रशासकीय पातळीवर आता मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून शहरात महिलांसाठी निर्भय वातावरण निर्माण करण्यासाठी धाराशिवच्या नगराध्यक्षा नेहाताई राहुल काकडे यांनी पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी शहरातील टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.

शहरातील शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग (ट्युशन क्लासेस) आणि बसस्थानक यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी मुलींना टवाळखोरांकडून होणारा त्रास वाढल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर, नेहाताई काकडे यांनी पोलीस प्रशासनाकडे खालील मागण्या मांडल्या. निर्भय पथक आणि पिंक पथकाची वर्दळीच्या ठिकाणी गस्त वाढवण्यात यावी, महिलांच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, महिलांमध्ये विश्वासाचे आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांनी सक्रिय राहावे आदी विषयांवर प्राधान्याने चर्चा करण्यात आली.

पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. महिला सुरक्षा हे पोलीस प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. शहरातील असुरक्षित ठिकाणांचे सर्वेक्षण करून त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त आणि गस्त अधिक प्रभावी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव शहर महिला व मुलींसाठी सुरक्षित, निर्भय आणि विश्वासार्ह बनवणे हाच आमचा मुख्य उद्देश असल्याचे
नगराध्यक्षा नेहाताई राहुल काकडे यांनी नमूद केले आहे.या महत्त्वपूर्ण बैठकीला कळंबच्या नगराध्यक्षा सुनंदाताई कापसे आणि धाराशिव नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती वैशालीताई सुशांत सोनवणे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून उचलण्यात आलेल्या या ठोस पावलामुळे शहरातील महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रभावी उपायोजना आखली जाईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Popular posts from this blog

आळणीची लेक डॉक्टर बनली!” – दिव्या वीरच्या यशाने गावाचा उंचावला मान

धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती निवडी दिवशी जिल्हा परिषद येथे सुतक पडल्यासारखे वातावरण मोठा खेळ,धनंजय सावंत,संजय काका लोखंडे, महेंद्र काका धुरगुडे, सुवर्णा सतीश पाटील यांचा पत्ता कट?

धाराशिवमध्ये तलाठ्याला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; खाजगी लिपीकासह अटक