धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक रणधुमाळी: चिखली मध्ये मल्हार पाटीलांचा आक्रमक इशारा, विरोधकांवर शब्दांचे बाण!...
धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक रणधुमाळी: चिखली मध्ये मल्हार पाटीलांचा आक्रमक इशारा, विरोधकांवर शब्दांचे बाण!...
प्रतिनिधी.... राहुल कोरे आळणीकर
धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा आखाडा चांगलाच पेटला असून आता निवडणुकीची रंगत शिगेला पोहोचली आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी जिल्ह्यातील नेत्यांच्या जाहीर सभा सुरू झाल्या असून या सभांमधून एकमेकांवर टीका–टिप्पणीचा कलगीतुरा रंगताना दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर काल सांजा जिल्हा परिषद गटातील चिखली गावात भारतीय जनता पार्टीचे युवा नेते मल्हार राणा जगजीतसिंह पाटील यांची भव्य जाहीर सभा पार पडली. या सभेमध्ये मल्हार पाटील यांनी विरोधकांवर जोरदार शब्दांत टीका करत उपस्थित कार्यकर्ते व मतदारांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला.
विरोधी उमेदवारावर निशाणा साधताना मल्हार पाटील म्हणाले,
“तू टोपण विकून जरी निवडणूक लढवण्याच्या बाता मारत असलास तरीही, तुझ्या पुढच्या शंभर पिढ्यांना पाटील कुटुंब पुरून उरणारे आहे. त्यामुळे आमच्या नादाला लागू नकोस,” असा थेट इशारा त्यांनी जाहीर सभेतून दिला. त्यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे संपूर्ण सभास्थळी एकच जल्लोष पाहायला मिळाला.
या सभेमुळे सांजा जिल्हा परिषद गटातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, विरोधकांवर केलेल्या या टीकेला ते कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुढे बोलताना मल्हार पाटील यांनी सांगितले की,
“सांजा जिल्हा परिषद गटातील भाजपचे सर्वच उमेदवार हे सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे.”
याचबरोबर त्यांनी मोठी विकासात्मक आश्वासने देत सांगितले की,
निवडणुका झाल्यानंतर सांजा गावासाठी २५ कोटी रुपयांचा विकास निधी देण्यात येईल, तर चिखली गावासाठी ५ कोटी रुपयांचा स्वतंत्र विकास निधी कामांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल.
सध्या तरी मल्हार पाटील यांच्या या जाहीर सभेमुळे सांजा जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचे पारडे जड होताना दिसून येत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
#धारशिवजील्हापरिषद