पडत्या पावसात, अंधाऱ्या रात्री परतलो तो काय पक्ष सोडण्यासाठी ?आमचा विरोधक हा राजकीय आहे त्यांना उत्तरही आम्ही राजकीय कार्यक्रमात देऊ
आमचा विरोधक हा राजकीय आहे त्यांना उत्तरही आम्ही राजकीय कार्यक्रमात देऊ
प्रा.सावंतानी खांद्यावर हात का ठेवला ? त्याच्या मागचा हेतू काय? ते त्यांनाच माहित.
कोणी खांद्यावर हात टाकला म्हणून निष्ठा बदलत नाही..
पण तेवढ्या काळापुरता खांद्यावर हात टाकला म्हणुन वेगळ्या चर्चा घडत असतील तर ठाकरे परिवाराने मला आजची ओळख दिलेली आहे. मग त्याची तर किती चर्चा व्हायला हवी, असे म्हणत आमदार कैलास घाडगे पाटील यांनी सध्या सुरू असलेल्या चर्चांवर आपले मत व्यक्त केले.
शिवजंयतीच्या कार्यक्रमात योगायोगाने झालेली काही क्षणांची भेट आमच राजकीय भविष्य बदलू शकत नाही. आमचं राजकीय जीवन ठाकरे कुटुंबासाठी समर्पित असून अशा संभ्रमाच्या राजकारणाला मी महत्व देत नाही. मुळात पक्षबदलावर मी प्रतिक्रिया देणे मला गरजेचे वाटत नसल्याचे पाटील म्हणाले. आपल्या राज्याची राजकीय संस्कृती ही अत्यंत वेगळी व सभ्य आहे. ती सभ्यता जपणे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य असते.
कितीही राजकीय विरोध असला तरी सार्वजनिक व अशा पवित्र कार्यक्रमामध्ये तो विरोध बाजूला ठेवून सर्वानी एकत्रित येत तो सोहळा साजरा करणे हीच आपली संस्कृती आहे. आमचा विरोधक हा राजकीय आहे त्यांना उत्तरही आम्ही राजकीय कार्यक्रमात देऊ. अशा ठिकाणी सर्वजण एका भावनेने एकत्र आलेले असतात ती भावना महत्वाची असते. त्याचे कोणी राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
शिवजंयती निमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या खांद्यावर हात टाकत फोटो काढले. हे फोटो माध्यमांवर व्हायरल होताच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. काल निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला बहाल केले. त्यानंतर लगेच जिल्ह्यातील हे तीन नेते एकत्र दिसल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या.